दरवर्षी आळंदीपासून पंढरपूरला जाणाऱ्या वारीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी विद्यालय ‘विद्यार्थी दिंडी’चे आयोजन करते.
या वर्षी सासवड येथे पालखीचे आगमन दि ११ जुलै २०२६ रोजी झाले. पालखीच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या दिंडी पथकाच्या कार्यक्रमात शाळेतील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी तसेच सकाळ व दुपार विभागाच्या शिक्षकांनी सहभाग घेतला.
वारकरी वेष धारण करून, टाळांच्या तालावर संतांचे अभंग गात गात या दिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी झाले. काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर , निवृत्तिनाथ, मुक्ताई ,आणि सोपानदेव या संतांची वेशभूषाही केली होती. ही विद्यार्थी दिंडी प्रशालेतून निघाली आणि पुणे-सासवड या पालखी महामार्गावरून सासवडकडे येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला स्वागतासाठी सामोरी गेली.
या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी अनुप्रिया पाडळकर हिने साक्षरता आणि सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर वारकऱ्यांचे प्रबोधन करण्याकरता लिहिलेल्या पथनाट्याचे सादरीकरण इयत्ता आठवी तक्षशिला आणि नालंदा या वर्गातील अनुप्रिया पाडळकर, संस्कृती जगताप.गार्गी नाचण. कार्तिकी ठाकरे, स्वराली शिवरकर आणि जान्हवी शेंडकर या विद्यार्थिनींनी केले. या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या मराठी विषयाच्या शिक्षिका सौ संगीता रिकामे आणि शिक्षक श्री सूर्यकांत खैरनार यांनी मार्गदर्शन केले होते.
दिंडीत सहभागी झालेल्या विद्यालयातील शिक्षक-शिक्षिकांनीदेखील विद्यार्थ्यांसोबत वारकरी नृत्य केले. दिंडीचे नियोजन विद्यालयातील शिक्षक श्री शिवहार लहाने श्री हिरामण सहारे , श्री शंकर विभाड इत्यादी शिक्षकांनी केले होते.




